शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. दुकानासमोर डस्टबिन न ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता थेट 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी, दुभाजकात किंवा चौकात कचरा फेकणाऱ्यांवरही जबर दंड आकारला जाणार आहे.
रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेतून मिळणार ‘स्वच्छ शहर’चा धडा
शहरात सध्या सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेमुळे महापालिकेच्या कारवाईची दहशत व्यापाऱ्यांमध्ये पसरली आहे. प्रशासनाला याची प्रचीती येत असून, याच संधीचा फायदा घेत आता महापालिका शहर स्वच्छतेसाठी अधिक सक्त आणि परिणामकारक भूमिका घेणार आहे.
डस्टबिन नसेल तर ५ हजारांचा दंड
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, प्रत्येक व्यावसायिक दुकानासमोर डस्टबिन असणे बंधनकारक आहे. जर कोणतेही दुकान डस्टबिनशिवाय आढळले, तर त्या दुकानदारावर ५,००० रुपयांचा त्वरित दंड आकारला जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला तरही कारवाई
फक्त दुकानदारच नव्हे, तर सामान्य नागरिकांनीही रस्त्यावर, दुभाजकात किंवा चौकात कचरा टाकल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई होणार आहे. महापालिकेच्या निरीक्षकांना अशा प्रकरणांमध्ये थेट दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
‘सिंगल युज प्लास्टिक’वर पूर्ण बंदी
शहरातून सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णतः थांबवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. व्यापाऱ्यांनी प्लास्टिकच्या ऐवजी पर्यावरणपूरक पर्याय वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
कारवाईची जबाबदारी 'स्वच्छता निरीक्षक' आणि 'नागरी मित्रां'कडे
या संपूर्ण मोहिमेची अंमलबजावणी महानगरपालिका उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. शहरातील सर्व १० झोनमध्ये ‘स्वच्छता निरीक्षक’ आणि ‘नागरी मित्र पथक’ – ज्यामध्ये माजी सैनिकांचा समावेश आहे – यांना दंड आकारणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत स्वच्छता निरीक्षकांना स्पष्ट आदेश दिले गेले असून, नागरिकांमध्ये जनजागृती करत, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.